Ticker

6/recent/ticker-posts

कृषी मूल्य साखळी भागीदारीतील महाराष्ट्राचे पाऊल क्रांतिकारक | शेतकरी राजाच्या जीवनात परिवर्तनाची संधी

कृषी मूल्य साखळी भागीदारीतील महाराष्ट्राचे पाऊल क्रांतिकारक| शेतकरी राजाच्या जीवनात परिवर्तनाची संधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २९:-  शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. 


महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफार्मेशन- 'मित्रा' संस्था, कृषी विभाग, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फांऊडेशन (व्हिएसटीएफ) यांच्यावतीने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ मध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार भरत गोगावले, आमदार अभिमन्यू पवार,  कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते. 

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या भागीदारी बैठकीत पंधराहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज झालेल्या सामंजस्य करारांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्याना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याचा शेतकरी आणि नागरिकांना फायदा होणार आहे. आपण 

2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन बनवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्यासाठी इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कौन्सिलची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कृषी, उद्योग, सेवा, क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या कौन्सिलने कृषी क्षेत्रात २.४ पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था मजबूत करण्याची शिफारस केली आहे. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे देशाची आर्थिक स्थिती दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स करण्याचा संकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून आपण एकजुटीने प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र हे लोकाभिमुख, उद्योगस्नेही आणि विकासाभिमुख राज्य असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, आजच आम्ही हायड्रोजन ऊर्जा, पोलाद या क्षेत्रातील करार केले आहेत. नुकताच आम्ही दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ कोटींचे करार केले आहेत. सर्वच क्षेत्रांत आपण अग्रेसर आहोत. आपला देश कृषीप्रधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संधी आहे. जगभरात अन्न प्रक्रिया उद्योग, अन्नसुरक्षा हे चर्चेचे विषय आहेत. त्यामुळे देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाताना प्रत्येकाचे योगदान मिळेल असा हा प्रयत्न असल्याचे उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी बांबू क्लस्टर विकास, तृणधान्ये उत्पादनाला चालना दिल्याची माहिती दिली. 

आजच्या कृषी मूल्य साखळी बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्ये, सोयाबीन, फळे, भाजीपाला आदी शेतकरी उत्पादक ५९ कंपन्या सहभागी झाल्या.‌ या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून ४२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कोका-कोला, पेप्सिको, ओएनडीसी, जैन इरिगेशन, ईटीजी ग्रुप, एडीएम इंडिया, मॅरिको, टाटा केमिकल्स, टाटा रॅलिस, आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था तसेच वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, नाबार्ड, नबकिसान फायनान्स लिमिटेड, सिडबी, आणि आयडीबीआय बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे TCS, सह्याद्री फार्म्स, मित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यात सामंजस्य करार झाले. 

Post a Comment

0 Comments